पाहुणे येतात अन जातात, मराठवाड्यात देशमुख पॅटर्न
पक्ष आपणच चालवायचाय लोणीकर/दानवे एकत्र

(विजयकुमार पिसे)
सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक कार्यकर्त्यांसाठी लढवणार, अशी भूमिका आ.सुभाषबापूंनी घेतली, आणि आ.विजयकुमार देशमुख यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्राधान्यक्रम देत दोस्तीचा हात पुढे केला. हा दोस्ताना पुढे असाच चालवायचाय.
दोन देशमुखांचा सोलापुरी पॅटर्न मराठवाड्यातही येऊ घालतोय. माजी मंत्री तथा आ. बबनराव लोणीकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातही विस्तव जात नाही. आता त्यांनाही एकीचे महत्व पटले आहे. त्यामुळे बबनराव लोणीकर म्हणाले, पाहुणे (इनकमिंग) येतात अन (आउटगोईंग) जातात, पक्ष आपल्यालाच (जुन्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनाच) चालवायचाय. सध्या भाजपात इनकमिंगचं अजीर्ण झालंय. भाजपाला एकही विरोधक नकोयत. म्हणून सगळीकडेच अन्य पक्षातून इनकमिंगचे पेव फुटले आहे. अशावेळीस लोणीकर यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना आवाहन करताना देशमुख पॅटर्नकडे लक्ष वेधले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, शिवाय जालना महापालिका निवडणूक लढवायची आहे. हाच आधार घेत लोणीकर निष्ठावंत कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, आम्ही दोघांनी (लोणीकर/दानवे) ठरवले तर जालना मनपा ताब्यात घेऊ शकतो. आमच्या मतभेदांना तिलांजली दिली आहे.
जालना जिल्ह्यात पक्षावर दानवे यांचा मोठा प्रभाव आहे. पक्ष कार्यालयात लोणीकर जेमतेम केव्हा तरी गेले आहेत. सोलापुरात दोन देशमुख एक़त्र आले तसा प्रयोग मराठवाड्यातही झाला तर। भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यानाही हेच अपेक्षित आहे. अन्यथा पाहुणे येतात, फळे खातात आणि जातात. पक्षाच्या विचाराशी देणेघेणे नाही. तेव्हा पक्ष आपल्यालाच चालवायचा आहे. निष्ठावंत कार्यकर्ताच पक्षाच्या कामी पडतोय, असं लोणीकरांचं मत आहे.
What's Your Reaction?






